
खेड, मावळ आणि हवेली तालुक्यातील ग्रामस्थांचा रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध
“शेतीच आमचा ब्रँड – विकासाच्या नावाखाली विनाश मान्य नाही”
बातमी 24तास (वृत्त सेवा):तळेगाव दाभाडे ते उरुळीकांचन या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाविरोधात खेड, मावळ आणि हवेली तालुक्यातील ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश उसळला आहे. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेती, घरे आणि उपजीविकेवर गदा येणार असून, सर्वत्र असंतोषाचे वातावरण आहे.या रेल्वे प्रकल्पांतर्गत व तर गेल्या काही वर्षांत एकूण ३.२५ लाख (३२५ हजार) हेक्टरहून अधिक जागा विविध प्रकल्पांसाठी संपादन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटला असून, ग्रामसभांमधून एकमुखाने “हा प्रकल्प रद्द करा” असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामस्थांचा संताप; आत्मदहनाची चेतावणीकुरुळी, निघोजे, चिंबळी, मोई, केळगाव तसेच हवेली तालुक्यातील गावांमध्ये ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर केला आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “या रेल्वेमुळे आमची शेती, घरे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली उपजीविका नष्ट होणार आहे. आधीच महामार्ग, एमआयडीसी, रिंगरोड, गॅस पाईपलाइन यांसाठी आमच्या जमिनी गेल्या. आता पुरे झाले.”महिलांच्या डोळ्यांत अश्रू आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. अनेकांनी स्पष्ट इशारा दिला – “सरकारने प्रकल्प मागे घेतला नाही, तर आत्मदहन आणि अमरण उपोषणाची तयारी आमच्याकडे आहे.”
लोकप्रतिनिधींची भूमिका या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले –> “जर आम्ही सरकारसमोर हात जोडून विनंती करू शकतो, तर गरज पडल्यास या शेतकऱ्यांसाठी वज्रमुठ करूनही उभे राहू. सरकारने ग्रामस्थांच्या तीव्र भावना ओळखल्या पाहिजेत.”तर आमदार बाबाजी काळे म्हणाले –> “शेतकऱ्यांच्या जमिनींचे अति-संपादन सुरू आहे. आजवर ३.२५ लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन विविध प्रकल्पांच्या नावाखाली घेतली गेली. हा अन्याय थांबवला नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल. विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विनाश नाही, तर त्यांचा सन्मान हवा.”या मेळाव्याला कुरुळीचे मा. उपसरपंच चंदन मुऱ्हे, पं.समिती सदस्य प्रशांत ढोरे, क्रांती ताई सोमवंशी,नियोजन समिती सदस्य वसंत भसे,आशिष येळवंडे, संतोष मुंगसे, कृ.उ.बा.संचालक सोमनाथ मुंगसे, सुनील आणा हगवणे, विक्रांत कांबळे,पंकज अरगडे , कुरुळीचे उपसरपंच गुलाब कांबळे, एम.के. सोनवणे, प्रमोद कड, गौतम कांबळे,उद्योगपती सुधीर मुंगसे,कृ.उ.बा. समिती सदस्य सागर मुऱ्हे, मा. उपसभापती अमर कांबळे, अजित गायकवाड, तारकेश्वर कांबळे,हेमंत काळडोखे, बाळासाहेब मुऱ्हे,आदी मान्यवरांसह सर्व रेल्वे प्रकल्प बाधित गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
