
बातमी 24तास
मंचर (विकास सुपेकर) आंबेगाव तालुक्यासह मंचर शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला असून, सणासुदीच्या काळातही नागरिक पावसामुळे घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत.शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसानगेल्या दोन दिवसांपासून अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने हातात तोंडाशी आलेली पिके पाण्यात बुडाली आहेत. सोयाबीन, मका, फ्लावर, कोबी,भाजीपाला, उसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आधीपासूनच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
व्यापाऱ्यांची चिंता वाढली:- सध्या नवरात्र उत्सव सुरू असून दसरा तोंडावर आला आहे. रविवारी आठवडे बाजाराचा दिवस असूनही सकाळपासून सतत पाऊस सुरू असल्याने ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत. शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असली तरी हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज दिल्याने व्यापाऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसामुळे व्यवसाय ठप्प राहण्याची शक्यता असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.आठवडे बाजार ओसाड:-मंचर हा तालुक्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार आहे. परिसरातील आंबेगाव, पारनेर, जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी रविवारी या बाजारात आपला माल विक्रीसाठी आणतात. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारात येण्यास पाठ फिरवली असून बाजारपेठ पूर्णपणे ओस पडली आहे. यामुळे स्थानिक विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.शहरात पाणी साचल्याने नागरिक त्रस्त:-सततच्या पावसामुळे मंचर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी रस्ते, गल्लीबोळात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीला पूरआंबेगाव तालुक्याला वरदान ठरणारे डिंभे धरण शंभर टक्के भरले असून धरणातून तब्बल २५,७९० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे घोड नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, कळंब सुलतानपूर येथील गोणवडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.परतीच्या पावसामुळे पिकांना लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र सततचा पाऊस, पूरस्थिती आणि निचऱ्याचा अभाव यामुळे हा पाऊस वरदान ठरण्याऐवजी शाप ठरत आहे, असे नागरिक सांगत आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
