
बातमी 24तास,चाकण (अतिश मेटे) गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार युवक पाण्यात बुडले. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वाकी बुद्रुक – भामा नदीत दोन युवक बुडालेवाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत अभिषेक संजय भाकरे (२१, रा. कोयाळी, ता. खेड) व आनंद जयस्वाल (२८, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे विसर्जनासाठी उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलवर गेल्याने ते बुडाले. यामध्ये आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला, तर अभिषेक भाकरे याचा शोध अजूनही सुरू आहे.शेलपिंपळगाव – नदीच्या प्रवाहात वाहून गेलेशेलपिंपळगाव (ता. खेड) येथे रवींद्र वासुदेव चौधरी (४५) हे नदीत विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू असून स्थानिक नागरिकांसह बचाव पथके नदीकाठी शोधमोहिम राबवत आहेत.बिरदवडी – विहिरीत पडून मृत्यूबिरदवडी (ता. खेड) येथील संदेश पोपट निकम (३५) हे गणेश विसर्जनासाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले व बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दल व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.बचावकार्य – पोलिस, एनडीआरएफ, अग्निशमन दल व रेस्क्यू टीमची मदतया सर्व घटनास्थळी तात्काळ चाकण पोलीस, एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल तसेच स्थानिक रेस्क्यू टीम दाखल झाली. पाण्यातील शोधमोहीमेसाठी नदीकाठ व विहिरीभोवती पथके तैनात आहेत. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता युवकांचा शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन धाब्यावर : गणेश विसर्जनादरम्यान “नदीत, विहिरीत किंवा खोल पाण्यात न उतरता कृत्रिम तलावांचा वापर करावा” असे आवाहन चाकण नगरपरिषद तसेच चाकण पोलीस, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून वारंवार करण्यात आले होते. तरीही काही भक्तांकडून हे आवाहन दुर्लक्षित करून थेट नदीपात्रात प्रवेश केला गेला. निष्काळजीपणामुळे दोन जणांचे प्राण गेले असून दोन अजूनही बेपत्ता आहेत.
परिसरात शोककळा गणेशोत्सवाचा उत्सव व भक्तिभावाने दुमदुमलेला परिसर या दुर्घटनांमुळे शोकाकुल झाला आहे. विसर्जनासंदर्भात प्रशासनाने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले असतानाही काही जणांकडून नदी, तलाव, विहिरींमध्ये उतरण्याचे धाडस केल्याने या घटना घडल्या. आता अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
