
बातमी24तास
चाकण ( प्रतिनिधी,अतिश मेटे ) शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सत्तेतल्या कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही मतदान करणार नाही.एवढे जरी सांगितलं तरी सरकार आणि सत्तेतील नेते गुडघे टेकत तुमच्याकडे येतील. असे परखड मत प्रहार शेतकरी संघटनेचे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आंबेठाण तालुका खेड येथे बोलताना केले.
संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन व अन्य समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
तत्पूर्वी त्यांनी स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे हृदयस्थान असलेल्या शरद जोशी यांचे स्मारकाला भेट देऊन त्या भूमीची माती कपाळाला लावली व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. घराची आणि परिसराची दुर्दशा पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. पुढील काळात सर्वाना एकत्रित आणून त्यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.सरकारपेक्षा आम्हा लोकांची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवस सुद्धा या स्मृतीस्थळी जाऊन श्रमदान करावे वाटत नाही ही शरमेची बाब आहे.स्मारक उभे करण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे बच्चु कडू यांनी यावेळी आश्वासन दिले. या कार्यक्रमास शामराव पवार, नंदकिशोर लोखंडे पाटील, विठ्ठल राजे पवार, संतोष मांडेकर, अनिल भांडवलकर,बाळासाहेब वर्पे पाटील, गिताबाई मांडेकर, राजश्री गायकवाड,कांचन मांडेकर,बाजीराव नाना लोखंडे पाटील यांच्यासह शेतकरी संघटना व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान,कार्यक्रमला येताना चाकण च्या वाहतुक कोंडीमुळे उशीर झाल्याचं सांगताना बच्चू कडू यांनी पुण्यातुन चालत आलो असतो तर कदाचित लवकर आलो असतो असे मिश्किल वक्तव्य करून चाकणच्या वाहतूक कोंडी बद्दल नाराजी दर्शवित चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न चिन्ह उभे केले.
2 ऑक्टोबर आंदोलन करणार दोन ऑक्टोबरचे आंदोलन हे दाखापत्र आंदोलन राहणार आहे.आतापर्यंत आम्ही गांधीगिरीने केली आतापर्यंत सरकार ला वेळ देत गेलो आहे.लाडक्या बहिणीला समिती नाही नेमली ज्या बहिणींना गरज नव्हती त्या बहिणींनी लाभ घेतला.लाडकी बहीण योजना ही मतासाठी केलेली योजना आहे.आणि आमची योजना ही वेदना थांबण्यासाठी ची योजना आहेउन्नत महाराष्ट्राचा नारा मागत असताना सर्वात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहे.
मुख्यमंत्र्यांना काहीतरी वाटले पाहिजे रोज हार तुरे घेत असताना रोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करतात आणि हे इकडे मौज मजा करतायत. या स्मृतीस्थळावरून मुख्यमंत्र्यांना संदेश देतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. सहा महिन्यात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.युद्धात जेव्हढे जवान शहीद झाले नाहीत त्यापेक्षा जास्त जण या व्यवस्थेन मारले असा घणाघात त्यांनी यावेळेस लगावला. एखादा नेता मेला की दुःख पाळतो मात्र देशात साडे सहा लाख शेतकरी यांनी आत्महत्या केली तरी एक दिवस श्रद्धांजलीचा नाही आणि म्हणून नऊ तारखेला आम्ही वेदनेचा धागा बांधतोय, ह्या वेदना सरकारला कळल्या पाहिजे असेही ते म्हणाले,सरकारने जातीपाती धर्मात गुंतून ठेवलाय ओबीसी मराठा अशा जातीपातीत गुंतून ठेवले आहे. जायचे होते दिल्लीला पण या सगळ्या राजकारणीने आम्हाला कलकत्त्याला पाठवलय असा टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.
आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ राखी पौर्णिमेनिमित्त काळी राखी बांधून शहीद शेतकऱ्यांना आदरांजली वाहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.